Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 189

यु क एक

$
0
0

नियोजन केल्यास शक्य

कॉलेज सुरू झालं की अभ्यासाबरोबरच धमालमस्ती सुरू होते. मग चालू होतात ते कॉलेजचे फेस्ट. त्यात आपल्या असाइनमेंटस्, प्रोजेक्टस्, वाढता अभ्यास हेही असतंच. मग आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा, उपक्रम येऊ लागतात. खूप मुलं गोंधळात पडतात, की नक्की काय करायचं. अनेकदा अभ्यास आणि स्पर्धा-उपक्रम या दोन्हीचा मिलाफ साधण्याचा प्रयत्न विद्यार्थी करतात. पण काहींना हा समतोल नाही साधता येत. आजच्या तंत्रज्ञानाच्या जमान्याचे विद्यार्थी खूप फायदे घेत आहेत. अभ्यास आणि स्पर्धा-उपक्रम या दोन्ही गोष्टींमध्ये त्यांचा समान सहभाग आहे. अभ्यास आता कुठेही, कधीही आणि कसाही करता येत असल्यानं विद्यार्थी स्पर्धा-उपक्रमांनादेखील वेळ देऊ शकतो. मला स्वत:ला सूत्रसंचालन, अभिनय, लेखन आणि इतरही बरंच काही करण्याची आवड आहे. हे सर्व करुनही मी अभ्यासदेखील उत्तम करते. माझ्या मते वेळेचं नियोजन, जिद्द- चिकाटी, मनाची तयार हे सर्व साधता येत असेल तर 'एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टिव्हिटीज' करण्यात काहीच अडचण येणार नाही. आजकाल प्रॅक्टिकल ज्ञानाला खूप महत्त्व आहे. आपल्याला आयुष्यात काय ध्येय साध्य करायचं आहे त्याप्रमाणे वेळेचं योग्य नियोजन, योग्य आहार, मनाची तयारी याची व्यवस्थित आखणी करून ते करता यायला हवं.

समृद्धी ठाकरे, रुईया कॉलेज

००००

कलागुणांची ओळख

तुम्हाला जर एखाद्या गोष्टीची आवड असेल तर सवड ही मिळतेच. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये सांस्कृतिक, क्रीडा असे विविध उपक्रम असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्यामधील कलागुणांची ओळख होते. अभ्यास व कॉलेजमध्ये विविध उपक्रम, स्पर्धा यांचा ताळमेळ जुळवून विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांत भाग घेतला, तरच विद्यार्थी म्हणून महाविद्यालयीन आयुष्य जगणं शक्य आहे. अभ्यासाच्या ताणामुळे कोणत्याही आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत सहभागी न होणं हे चुकीचं आहे. विद्यार्थ्यांनी जर अभ्यासावरच भर दिला, तर त्यांचा बाकीच्या क्षेत्रात विकास होणारच नाही. एक विद्यार्थी म्हणून आपल्याला शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडा या तीनही गोष्टींमध्ये आपला विकास करणं फार गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी आज मल्टिटास्किंग असणं फार गरजेचं आहे. स्वतःमध्ये असलेले गुण ओळखावे आणि त्याप्रमाणे विविध उपक्रमांमध्ये सहभाग घ्यावा.

शुभांगी धनुर्धारी

मुंबई विद्यापीठ

0000

मार्गदर्शन, पाठिंबा हवा

वेगवेगळ्या स्पर्धांतून विद्यार्थ्यांच्या नृत्य, गायन, अभिनय, क्रीडा अशा विविध कलागुणांना वाव तर मिळतोच, शिवाय व्यक्तिमत्त्वाची जडणघडणही होते. त्यासाठी विद्यार्थ्यांना केवळ प्रोत्साहन न देता मार्गदर्शन आणि पाठिंबा देणं जास्त गरजेचं आहे. महाविद्यालयीन महोत्सवांमुळे तरुणाईला त्यांची कला सादर करण्याची संधी मिळत असते. त्यामुळे हे महोत्सव हळूहळू एक दर्जेदार कलावंत घडवत असतात. सांस्कृतिक महोत्सवांमुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास आणि कलावंतांची एक वेगळी ओळख तयार होते. त्यातूनच एक उत्तम दर्जाचा कलावंत घडू शकतो. शिस्त, कार्यक्रमांचं आयोजन आणि व्यवस्थापन याची पुरेपूर माहिती विद्यार्थ्यांना या माध्यमातून मिळते. काही महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये फेस्ट, उपक्रम याबाबतीत पुरेशी जागरुकताच नसते. यासाठी व्यवस्थापनाकडून प्रयत्न व्हायला हवेत. रोजच्या एकसुरीपणातून काहीतरी वेगळं म्हणूनही या स्पर्धांमध्ये सहभागी व्हायला हवं. स्पर्धा आणि अभ्यास दोहोंची व्यवस्थित सांगड घालणं गरजेचं आहे.

- विनायक तांबिटकर, साठ्ये कॉलेज

0000

ताण वाढवू नका

कॉलेजमध्ये होणाऱ्या नवनवीन स्पर्धा, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा, नवनवीन उपक्रम हे विद्यार्थ्यांना उत्साहीत करणारे ठरतात. विद्यार्थ्यांना यातून नवीन प्रेरणा मिळते. स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमधील कला, त्याच्या आवडीनिवडी सर्वांसमोर येतात. त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. मात्र वाढत्या अभ्यासक्रमामुळे, असाइनमेंट्स, प्रोजेक्ट्स यामुळे त्यांच्यावरील ताण वाढतो. स्पर्धांपेक्षा प्रोजेक्ट्स पूर्ण करणं हेच त्यांना योग्य वाटतं. मग प्राधान्य या गोष्टींना देऊन विद्यार्थी स्पर्धांपासून लांब होतात. स्पर्धांमुळे मिळणारे प्रॅक्टिकल ज्ञान विद्यार्थ्यांना अनुभवता येत नाहीत. स्वतःमधील कला, छंद ते ओळखू शकत नाहीत. अभ्यास करणं, प्रोजेक्ट्स पूर्ण करणं या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच. पण त्याबरोबरच स्वतःमधील कलागुणांना वाव देणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे.

धीरज बालोडे, आरकेटी कॉलेज

००००

प्रात्यक्षिक अनुभव

कॉलेज सुरू झालं की उत्सुकता असते ती विविध स्पर्धा आणि उपक्रमांची. खरं तर अभ्यास आणि परीक्षा याबरोबरच इतर सर्व उपक्रमांमध्ये आम्ही जास्त रमतो. पण सध्या वाढलेला अभ्यासक्रम आणि वाढत्या शैक्षणिक स्पर्धेमुळे अन्य उपक्रमांमध्ये भाग घेताना विचार करावा लागतो. अभ्यास की स्पर्धा यामध्ये पालकसुद्धा अभ्यासाला जास्त महत्त्व देतात. पण अभ्यासातून थोडं डोक वर काढून वेगवेगळ्या उपक्रमांत भाग घेतल्यानं प्रात्यक्षिक अनुभव आणि आत्मविश्वास वाढतो. पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्पर्धांमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहीत केलं पाहिजे. विविध स्पर्धांमुळे विद्यार्थांना येग्य ठिकाणी आणि योग्य प्रकारे विचार मांडण्याची, व्यक्त होण्याची संधी मिळते.

भाग्यश्री गोखले, आरकेटी कॉलेज

००००

स्पर्धा उत्तम मार्ग

या स्पर्धांतून आपल्याला आपली ओळख मिळते. आपलं व्यक्तिमत्त्व घडत असतं. 'आम्हाला खूप अभ्यास असतो' अशी कारणं देऊन विद्यार्थी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत भाग घेणं टाळतात. पण माझ्या मते अभ्यासाशिवाय स्वत:ला घडवण्यासाठी या स्पर्धा खूप उपयोगी ठरतात. अभ्यासाच्या अतितणावामुळे विद्यार्थी या उपक्रमांपासून लांब राहतात. स्वतःला शोधण्याचा, घडवण्याचा आणि कला जोपासण्याचा स्पर्धा हा उत्तम मार्ग आहे. अभ्यास तर करायचा आहेच, सोबत स्वतःला वेळ देणे आणि नवीन काहीतरी शिकत राहण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि हे विविध उपक्रमांच्या माध्यमातून घडून येते. अभ्यास आणि स्पर्धा प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी अभ्यासाबरोबर स्पर्धेत सहभागी होणं खुप महत्त्वाचं आहे. थोडा वेळ स्वतःसाठी काढून, अभ्यासाच्या ताणापासून दूर राहण्यासाठी स्पर्धा आणि अभ्यास यात सुवर्णमध्य साधायला हवा.

संकेत शिर्के, रुपारेल कॉलेज

0000

संख्या रोडावतेय

कॉलेजमधील अभ्यास, प्रोजेक्ट, कोचिंगक्लास यामुळे विद्यार्थी खूप थकतात. त्यामुळे त्यांना आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा, महाविद्यालयातील उपक्रमांमध्ये सहभागी होता येत नाही. अर्थात अभ्यासाच्या अतिताणामुळेही 'एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टिव्हिटी'मध्ये भाग घेण्याऱ्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे. मी स्वतः कॉलेजमधील विविध मंडळं, स्पर्धा-उपक्रमांमध्ये सक्रिय आहे. या विविध मंडळांमध्ये काम करताना खूप वेगळे अनुभव येतात. नवीन मुलं, प्राध्यापक, साहित्यिक, कलाकार यांच्याशी ओळख होते. त्यामुळे अभ्यासाबरोबरच या सर्व गोष्टी आता माझ्या आयुष्याचा एक भाग बनल्या आहेत. म्हणूनच मला वाटतं की, विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धा-उपक्रमांमध्ये सातत्यानं सक्रिय राहिलं पाहिजे. 'इच्छा तिथे मार्ग' त्यामुळे जर नियोजन केलं तर अभ्यास आणि हे उपक्रम या दोघांना आपण योग्य वेळ देऊ शकतो.

- पार्थ डोंगरे, वझे-केळकर कॉलेज

0000

भाग घेणं महत्त्वाचं

प्रत्येक विद्यार्थाला स्पर्धांमध्ये भाग घ्यायची इच्छा असते. पण हे सगळं करत राहीलो आणि परीक्षेत मार्क कमी मिळाले तर माझं करिअर घडणार नाही, अशी भीती अनेकांना वाटते. पण त्या विद्यार्थ्यांना हे समजत‌ नाही की 'एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टिव्हीटीज'मुळे आपलं करिअर आणखी उत्तम घडू शकते. स्पर्धांमध्ये भाग घेतल्यामुळे अनेक फायदे होतात. आपलं व्यक्तिमत्त्व सुधारते, संवादकौशल्यं सुधारतं. आत्मविश्वास येतो, अनेक बरे-वाईट अनुभव येतात आणि त्यातूनच‌ 'व्यक्ती तितक्या प्रकृती'‌ ही मराठीतली म्हण कशी खरी आहे हे समजून येतं. अभ्यास आणि‌ स्पर्धा या दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात फार महत्त्वाच्या आहेत. प्रत्येकाने आपलं स्वत:चं व्यक्तिमत्त्व, अभ्यासक्रम पाहून यामध्ये योग्य तो सुवर्णमध्य काढायला हवा. प्रत्येक विद्यार्थ्यात काही ना काही कला असतातच. मग त्या कलेच्या जोरावर किमान एकदा तरी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायला हवा. सध्याच स्पर्धेचं जग जवळून अनुभवण्यासाठी या स्पर्धांमध्ये भाग घेणं फार महत्वाचे आहे.

श्रुती रसाळ, साठ्ये कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 189

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>