संकट टाळण्यासाठी आधीच उपाय मुंबई म्हणजे स्वप्नांची नगरी. अनेक लोकांना कुशीत घेत या शहरानं त्यांना आसरा दिला. पण, आज त्याच मुंबईची झालेली दयनीय अवस्था बघता तिच्यावर उपचार करणं गरजेचं झालं आहे. वाढते नागरीकरण आणि लोकसंख्येमुळे मुंबईवर संकटं कोसळत आहेत. मुसळधार पावसामुळे रस्ते उखडले गेले आहेत. पूल कोसळणं, इमारती धोकादायक होणं, पाणी साचून वाहतूक कोंडी होणं, रस्ते खचणं अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. मुंबईला स्मार्टसिटी बनण्याऐवजी डेडसिटी होत चालल्याचं दुःख आहे. ह्या मुंबईला भविष्यात पुढे घेऊन जाण्यासाठी सरकारनं आपलं काम चोख केलं पाहिजे. कुठलंही संकट आल्यावर त्याचा विचार करू नये, तर संकट येण्याच्या आधी ते टाळण्यासाठी विचार करणं गरजेचं आहे. विजय पोतदार, रुईया कॉलेज 0000 आरोप-प्रत्यारोप नको मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. त्यामुळे मुंबईला ताब्यात ठेवण्यासाठी सगळे जण उतावीळ आहेत. परंतु मुंबईकरांचं सध्याचं जगणं कसं किड्यामुंग्यांप्रमाणे झालं आहे याचं सोयरसुतक कुणालाही नाही. कुठं उघड्या मॅनहोलमध्ये पडून माणसं मरत आहेत, तर कुठे पूल कोसळतोय. परंतु त्याला जबाबदार कोण यावरून वाद, आरोप-प्रत्यारोप होतात. जबाबदारी निश्चित करा पण, त्यापेक्षा अशा घटना घडू नयेत म्हणून काय काळजी घेता येईल हे महत्त्वाचं आहे. मुंबईतल्या पायाभूत सोयी-सुविधा चांगल्या करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. मुंबईच्या देखभालीचं उत्तरदायित्व सर्वांवर आहे. सामान्य मुंबईकरांची एवढीच अपेक्षा आहे की सर्व नेत्यांनी, सत्ताधाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावं. सामान्य मुंबईकरांचा प्राण निश्चितच महत्त्वाचा आहे. नेहा सानप, पेंढारकर कॉलेज 0000 मुंबईकरानं व्हावं स्मार्ट मुंबईच्या भवितव्याचा विचार करण्याआधी आत्ता घडत असलेल्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. अंधेरी स्टेशनवरील दुर्घटनेची जबाबदारी महानगरपालिका व रेल्वे प्रशासनानं एकमेकांवर ढकलली. पण, त्याऐवजी घटनेच्या मुळाशी जाऊन अश्या घटना भविष्यात कशाप्रकारे टाळता येतील यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. जर दोन्ही सेवांतील अधिकाऱ्यांनी आधीच पुरेसं लक्ष दिलं असतं तर ही दुर्घटना घडलीच नसती. म्हणजे सर्वप्रथम सरकारी अधिकाऱ्यांनी दक्ष राहायला हवं. स्मार्ट सिटी, मेट्रो रेल, मोनो रेल, बुलेट ट्रेन हे ठीक आहे. पण मुळात लोकल रेल्वेसेवा, रस्त्यावरील खड्डे यावर आधी लक्ष दिलं गेलं पाहिजे. फक्त देशाच्या आर्थिक राजधानीत राहतो म्हणून टेंभा मिरवण्यापेक्षा त्या शहराच्या जडणघडणीत आपण काय वाटा उचलतोय याचा आपणही विचार करायला हवा. 'आमची मुंबई'ऐवजी प्रत्येकानं 'माझी मुंबई' म्हणून आपली कर्तव्यं बजावली पाहिजेत. लोकशाही देश म्हणवून घेत असताना शासनाला त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडायला भाग पाडणं, हे देखील नागरिकांचं कर्तव्यच आहे. मुंबई स्मार्टसिटी करायच्या आधी मुंबईकर स्मार्ट झाला पाहिजे. प्रशासकीय अधिकारी व आपण मुंबईकरांनी आपली भूमिका उत्तमरीत्या पार पाडली पाहिजे. कारण त्यावरच मुंबईचं उत्तम भविष्य अवलंबून आहे. यश पवार, साठ्ये कॉलेज
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट